मुंबई / कृषी वार्ता न्यूज: महाराष्ट्रातील हवामान (Mumbai Weather) सध्या अत्यंत गंभीर बनले आहे. विशेषतः मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पावसाने जोर धरला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 ते 48 तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. मुंबईसाठी ‘अतिमुसळधार पावसाचा’ ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पालघर जिल्ह्यासाठी ‘अतिवृष्टीचा’ रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
कोकण किनारपट्टीवर सध्या वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे पावसाची तीव्रता वाढली आहे. जोरदार वारे आणि खवळलेला समुद्र यामुळे किनारपट्टीवर लाटांचा मारा सुरू आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, सांताक्रूझ केंद्रात आज सकाळी 8:30 पर्यंत 60.5 मिमी, तर कुलाबा केंद्रात 142.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. उपनगरांमध्येही पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर होऊ शकतो.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांमध्ये हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासन सतर्क असून, आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
हवामान विभागाने सागरी किनाऱ्यांवरील नागरिकांसाठी विशेष सूचना जारी केल्या आहेत. आज रात्री 11:30 वाजेपर्यंत समुद्रात 3.5 ते 3.8 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना लहान नौकांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. किनारपट्टीवरील पर्यटकांनाही समुद्रकिनारी फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. स्थानिक आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयुष्मान कार्डद्वारे मोफत उपचार: घरबसल्या जाणून घ्या कोणत्या रुग्णालयात मिळेल सुविधा!
हवामान विभागाने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी सावधगिरीने वाहन चालवावे. तसेच, जोरदार वाऱ्यांमुळे झाडे किंवा विजेचे खांब पडण्याचा धोका असल्याने घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. पावसामुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळे येण्याची शक्यता असल्याने प्रवासाचे नियोजन करताना हवामानाचा अंदाज विचारात घ्यावा, असेही हवामान खात्याने सुचवले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्याची द्रोणीय स्थिती यामुळे कोकण आणि मुंबईत पावसाचा जोर कायम राहील. नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.