Vihir Anudan Yojana: विहिरीने बदलले आयुष्य, अल्पभूधारक शेतकऱ्याची प्रेरणादायी यशोगाथा

Vihir Anudan Yojana: विहिरीने बदलले आयुष्य, अल्पभूधारक शेतकऱ्याची प्रेरणादायी यशोगाथा

शेवगाव/कृषी वार्ता न्यूज: शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव गावात राहणारे रामनाथ रतन खंडागळे यांच्याकडे फक्त साडेतीन एकर शेती आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना बराच काळ कोरडवाहू शेतीवर अवलंबून राहावे लागले. पावसाच्या लहरीपणामुळे बाजरी, तूर, कापूस यांसारख्या पिकांचे उत्पन्न अनिश्चित होते. कधी पाऊस उशिरा झाला, तर पिके करपून जायची; तर कधी पाण्याअभावी उत्पन्नच निघत नसे. यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतीबरोबरच मोलमजुरी करावी लागत होती. घर चालवणेही कठीण झाले होते. पण त्यांच्या आयुष्यात खरा बदल घडला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून.

या योजनेची माहिती रामनाथ यांना गावातील एका शेतकरी मेळाव्यात मिळाली. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी ही योजना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जाते. याअंतर्गत विहिरीसाठी अनुदान मिळते. माहिती मिळताच त्यांनी शेवगाव पंचायत समितीकडे अर्ज सादर केला. त्यांच्या अर्जाला मंजुरी मिळाली आणि सुमारे दीड वर्षांपूर्वी त्यांच्या शेतात विहीर खोदण्यात आली. यासाठी त्यांना अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळाले. ही विहीर त्यांच्या आयुष्यातील एक मैलाचा दगड ठरली.

शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी स्वतःच्या शेतात केली सोयाबीनची पेरणी! स्वतः हाती घेतली तिफन, काळ्या मातीत दिवसभर राबले तुपकर कुटुंब..

विहिरीमुळे शेतात पाण्याची उपलब्धता वाढली आणि रामनाथ यांनी कोरडवाहू शेती सोडून बागायती शेतीकडे वाटचाल सुरू केली. आता त्यांच्या शेतात कांदा, मिरची, टोमॅटो, भाजीपाला आणि काही फळझाडांचेही पीक घेतले जाते. यामुळे त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. केवळ उत्पन्नच नाही, तर त्यात स्थिरताही आली. आधी पावसाच्या अनिश्चिततेमुळे होणारे नुकसान आता इतिहासजमा झाले. यामुळे त्यांचे जीवनमानही सुधारले आहे.

सिंचनासाठी लागणारी वीज ही आणखी एक अडचण होती. परंतु, यावरही त्यांनी उपाय शोधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेत त्यांनी शंभर टक्के अनुदानावर सौर कृषिपंप बसवला. यामुळे विजेच्या अनियमिततेचा प्रश्न कायमचा सुटला. आता त्यांचे शेत वर्षभर हिरवेगार राहते आणि उत्पादनात सातत्य राखले जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत आता (Vihir Anudan Yojana) अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपये आणि पंपसंचासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्जदाराकडे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते आणि किमान ०.४० हेक्टर जमीन (नवीन विहिरीसाठी) असणे आवश्यक आहे.

रामनाथ खंडागळे यांची ही यशोगाथा ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. सरकारी योजनांचा योग्य लाभ घेतल्यास शेतीतूनही समृद्धी मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या यशामुळे गावातील इतर शेतकरीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत आहेत.

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on “Vihir Anudan Yojana: विहिरीने बदलले आयुष्य, अल्पभूधारक शेतकऱ्याची प्रेरणादायी यशोगाथा”

Leave a Comment

WhatsApp Join Group!